Logo Omkar Mission Dombivali

Books

now browsing by category

 

अंतःप्रज्ञा

Blog placeholder

भारतीय ऋषी मुनींनी ज्ञानप्राप्ती साठी अंत:प्रज्ञेवर भर दिला व ते अंत:र्मूख झाले. या उलट पाश्चात्य वैज्ञानिकांनी बहि:र्मुख चिंतनाच्या द्वारे विश्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी त्यांनी तार्किक विश्लेषण (Logical Analysis) तार्किक अनुमान पद्धती, प्रमाण तसेच तुलनात्मक विवेचन या पद्धतीचा वापर केला.

पाश्चात्य विज्ञानाचा उगम ग्रीक परंपरेमध्ये आहे. विश्वाचे सुव्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर पाश्चात्य विचारवंत या निष्कर्षा पर्यंत पोहचले की विश्वाचे रहस्य उलगडण्या साठी पुराण कथा व अंधविश्वास यांचा काही एक उपयोग होणार नाही. म्हणून विश्वाचे रहस्य उलगडण्या साठी त्यांनी तर्कप्रणालीवर जोर दिला. जे आपल्या बुद्धीला पटत नाही, प्रयोग शाळेत जे सिद्ध करता येत नाही, त्या गोष्टींची त्यांनी उपेक्षा केली. विज्ञान क्षेत्रातून व्यक्तीनिष्ठता पूर्णपणे घालविण्यासाठी त्यांनी प्रायोगिक तसेच प्रत्यक्ष अनुभवसिद्ध पद्धतीचा अधिकाधिक उपयोग केला.

त्यांच्या अफाट प्रयत्नांतूनच अनेक अज्ञात असणारे नियम माणसाला ज्ञात झाले. पाश्चात्य वैज्ञानिकांना तर्कनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता यांच्या बाह्य कार्यप्रणालीवर ज्या प्रचंड वेगाने सफलता भेटली त्याच वेगाने अंत:प्रज्ञेवर विश्वास ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती नष्ट झाली. याचा परिणाम असा झाला की  भौतिक शास्त्रच नाही तर मानसशास्त्र, समाजशास्त्र या विषयांवर सुद्धा वस्तुनिष्टतेचा अतिरेक प्रभाव पडला. समाज शास्त्रज्ञांना सुद्धा शास्त्रज्ञ म्हटले जावू लागले व त्यांनी संशोधनाची जी पद्धती विकसित केली तिला ‘शास्त्रीय पद्धती’ म्हटली जावू लागली. जर वस्तुनिष्टतेच्या आधारावर कोणी संशोधन केले नाही तर ती पद्धत अयोग्य ठरवून तिची अवहेलना केली जाऊ लागली

परंतु स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारे हे लोक ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत की भौतिक शास्त्रांमध्ये ज्या भौतिक वस्तूचा विचार केला जातो ती वस्तू म्हणजे पदार्थ आहे. पदार्थाच्या संशोधनासाठी वस्तुनिष्टतेचा प्रयोग करणे उचितच आहे परंतु मानसशास्त्रा सारख्या विषयांमध्ये वस्तू नाही. भावना, इच्छा, आकांक्षा, राग, द्वेष, परहित प्रवृत्ती, आक्रमक प्रवृत्ती यांसारख्या मनोव्यापारांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्रज्ञांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या वस्तू पदार्थ नाहीत, त्या दृश्य नाहीत.

भावना, इच्छा, वृत्ती, प्रवृत्ती तसेच मन, बुद्धी, आत्मा हे प्रयोग शाळेत सिद्ध करता येत नाही त्यामुळे त्यांना अस्तित्वच नाही. अशा प्रकारचा अट्टाहास ज्यावेळी स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारी माणसं करून घेतात त्या वेळेला त्यांच्या शहाणपणाची कीव येते. कोणाला मान्य असो अथवा नसो, ज्ञान प्राप्तीच्या संदर्भात अंतःप्रज्ञेचा उपयोग निश्चितच होतो असा निर्वाळा वैज्ञानिक क्षेत्रामधील महर्षी असणाऱ्या अनेक वैज्ञानिकांनीच दिला आहे. केक्युले, न्युटन, आइनस्टाईन इत्यादींचा या संदर्भात अनुभव उल्लेखनीय आहे.

रसायन शास्त्रामधील ‘केक्युले’ या शास्त्रज्ञाचा अंतःप्रज्ञेच्या संदर्भातील अनुभव आश्चर्यचकित करणारा आहे. एके दिवशी केक्युले हा शास्त्रज्ञ रात्री शेवटच्या बसने घरी येत होता. केक्युले बसमध्ये अर्धनिद्रा अवस्थेमध्ये होता. अचानक त्याला दृश्य जाणवलं की रासायनिक अणु नृत्य करत आहेत. या अगोदर सुद्धा त्याला अणूंची गतिमान अवस्था जाणवली होती. परंतु अणुमधील गतीचे स्वरूप स्पष्ट होत नव्हते. यावेळेला मात्र त्याला रासायनिक अणूंची गती स्पष्ट जाणवली. त्यानंतर त्याने कागदावर ह्या दृश्याचे रेखाचित्र तयार करून आपल्या सिद्धांताची मांडणी केली.

आईनस्टाईनचा सापेक्षतावाद सिद्धांत हा विज्ञानामधील एक अतिशय महत्वाचा असा सिद्धांत आहे परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एव्हढ्या महत्वाच्या सिद्धांताचा शोध आईनस्टाईनने आपल्या अंतःप्रज्ञेच्या जोरावर लावला. आईनस्टाइनचे काही सिद्धांत एवढे विचित्र होते की शास्त्रज्ञांचा त्याच्यावर विश्वासच बसेना. उदाः आईनस्टाइनच्या मते प्रकाशाच्या वेगाबरोबर त्याची तीव्रता वाढते. पदार्थामध्ये त्याच्या गतीनुसार आकुंचनाची क्रिया होते. अवकाश वक्रीभूत आहे. आईनस्टाइनचे हे सिद्धांत तर्कवादी शास्त्रज्ञांना कवी कल्पना वाटत होते.

शास्त्रज्ञांनी प्रायोगिक तत्वप्रणाली नुसार आईनस्टाइनच्या अनेक निष्कर्षाची प्रत्यक्ष अनुभव घ्यायला सुरुवात केली तेव्हा ते सिद्धांत खरे आहेत हे सिद्ध झाले. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आईनस्टाईन आपल्या संशोधनासाठी प्रयोगशाळेत गेला नाही अथवा त्याने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग केले नाहीत. आईनस्टाइनने फक्त अंतर्मुखी चिंतनाच्या जोरावर अंतःप्रज्ञे द्वारे शोध लावले. अंतःप्रज्ञेवर त्याचा अतूट विश्वास होता. अंतप्रज्ञा व तर्कप्रज्ञा ह्या परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. उच्च प्रतीच्या वैज्ञानिकांनी वैज्ञानिक संशोधनात अंतःप्रज्ञेचा उपयोग केला व जाणून बुजून तिचा उल्लेखही केला परंतु अजूनही काही हटवादी वैज्ञानिक अंतःप्रज्ञेला विश्वरहस्य उलगडण्याच्या बाबतीत मान्यता देत नाही कारण वैज्ञानिक क्षेत्रात अंतःप्रज्ञेच अस्तित्व मान्य केलं तर विज्ञानामधून अध्यात्माची द्वारे सताड उघडी होतील.

हटवादी वैज्ञानिक हे मान्य करोत अथवा न करोत आईनस्टाइनचा सापेक्षतावाद सिद्धांत (Relativity principle) हायजेनबर्ग शास्त्रज्ञाचा अनिश्चीततावाद सिद्धांत (Uncertainty principle) ‘मॅक्स प्लॅक्स’चा  क्वाँटम सिद्धांत (Quantum Theory) या सर्व सिद्धांतांनी न्युटनच्या विश्वविषयक संकल्पना मध्ये पूर्णपणे बदल करून टाकला आहे.  न्युटनच्या सिद्धांतावर उभा असलेला आधुनिक विज्ञानाचा पाया या शास्त्रज्ञांनी डळमळीत करून टाकला आहे. आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांचे विचार व भारतीय ऋषी मुनींनी ऋतुंभरा प्रज्ञेद्वारे मांडलेले विचार या सर्वांमध्ये इतके साम्य आहे की यातला कुठला विचार ऋषी मुनींनी मांडला आहे व कुठला विचार शास्त्रज्ञांनी मांडला आहे हे कळायला सुद्धा जागा नाही.

आजच्या आधुनिक युगामधील सर्वात आश्चर्यकारक घटना जर कोणती असेल तर ती ही आहे की निरीक्षणे, प्रयोग, पदार्थांचे पृथक्करण, अणूंचे संशोधन, अथक प्रयास, अविश्रांत श्रम, अब्जावधींचा चुराडा करून विज्ञानाच्या प्रायोगिक तत्व प्रणालीला अनुसरून आजचे वैज्ञानिक ज्या निष्कर्षा पर्यंत पोहचले आहेत त्यांचे ते निष्कर्ष व कुठल्याही प्रकारच्या प्रयोग शाळेत न जाता कुठलेही प्रयोग न करता केवळ अंतःर्मुखी चिंतन, ध्यान, समाधी, साक्षात्कार यांच्या योगे प्राचीन ऋषीमुनींनी मांडलेले निष्कर्ष यांच्या मध्ये कल्पनातीत समानता आहे.

नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ श्रोडींगर याने क्वाँटम सिद्धांतातील मुलभूत समीकरणांना संख्याबद्ध केले, सूत्रबद्ध केले. क्वाँटम सिद्धांताच्या प्रणेत्या मधील श्रोडींगर हा पहिला शास्त्रज्ञ आहे की, ज्याने वैदिक उपनिषदांचे विचार व आधुनिक विचारवंताचे विचार यांच्यामधील समानता जाणली. त्याने आपल्या दोन पुस्तकांमधील ‘MY VIEW OF THE WORLD’ आणि ‘MIND AND MATTER’ ह्या पुस्तकांतर्गत आपल्या विचारांचे प्रतिपादन केले आहे.

काही वर्षापूर्वी स्वीस शास्त्रज्ञ Fritjof Capra  याने आधुनिक विज्ञानातील संशोधन आणि पौर्वात्य देशामधील प्राचीन ज्ञानाची समानता यांच्यावर स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्याचं नावं आहे- The Tao Of Physics. काप्राच्या मते विसाव्या शतकाचे आधार स्तंभ असणारे क्वाँटम सिद्धांत (Quantum Theory) आणि सापेक्षतावाद सिद्धांत (Relativity Theory) यांच्या मुळे विश्वाकडे पाहण्याची एक नवीनच दृष्टी प्राप्त झाली आहे.

विश्व व विश्वाचा व्यवहार हा सत्य नसून मनोजन्य आहे. सत्य मानवाच्या दृष्टीच्या कक्षेत येत नाही. विश्वामधील विविध पदार्थ, विविध वस्तू, जड, चेतन, पशु, पक्षी, मानव, प्राणी, ग्रह, नक्षत्रे, तारे ह्या अखिल चराचर विश्वामधील भिन्न पदार्थ हे वास्तविक एकाच मूळ तत्वाचे अविष्कार आहेत. भारतीय विचारवंत त्याला ‘ब्रम्ह’ या नावाने संबोधतात. अखिल चराचर सृष्टीमध्ये हे ब्रम्ह म्हणजेच चैतन्य कोंदून कोंदून भरले आहे. ते आपल्या इंद्रियांच्या कक्षेत येत नाही. इंद्रियाच्या कक्षेत येणाऱ्या विश्वालाच सत्य समजणे हे अज्ञान होय.

ब्रह्मच सत्य आहे हे जाणणे व अनुभवणे हेच खरे ज्ञान आहे. विश्व हे जैविक (Organic), गतिशील (Dynamic), परस्पर सबंधित (Dependent), चिरंतन (Eternal) असे आहे. जळी, स्थळी, काष्ठी परमात्मा आहे. जीव, जगत व जगदीश यांच्यामध्ये अलौकिक सबंध आहे. सृष्टा व सृष्टी एकच आहे. आत्मा व परमात्मा एकच आहे हा अद्वैतवाद हाच भारतीय विचार प्रणालीचा गाभा आहे. गति आणि परिवर्तन विश्वाचा अविभाज्य भाग आहे. गति उत्पन्न करणारी शक्ती विश्वाच्या बाहेर आहे या ग्रीक परंपरागत विज्ञानाच्या कल्पनेवर त्यांचा विश्वास नाही. विश्वाचे केंद्र बाहेर नसून आपल्या आतच आहे. माणूस अंतर्मुख झाला की ध्यानाच्या माध्यमातून अंतर्ज्ञान व अंतःप्रज्ञेद्वारा मनुष्याला या सत्याचा साक्षात्कार होतो.

ज्ञाता हा ज्ञेयाशी एकरूप आहे. Observer and Object are the same. अखिल विश्व ब्रम्हांड ज्या अंतिम सत्याचा शोध घेत आहे तो माझ्या आतच आहे. तो व मी भिन्न नसून ‘आत्मा हाच परमात्मा आहे’ हेच भारतीय तत्त्वज्ञानाचे सार आहे. हेच आमचं महायोग विज्ञान आहे. हे महायोग विज्ञान जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर योग्य सदगुरूच्या मार्गदर्शना खाली साधना (प्रयोग) करा. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शक्ती, ज्ञान व आत्मविश्वास यांची  आवश्यकता असते. शक्ती, ज्ञान व आत्मविश्वास हे बाजारातून विकत घेता येत नाही. त्यासाठी कष्ट व मेहनत करावी लागते. अध्यात्म हे ढोंगी व आळशी लोकांसाठी नाही. येथे हिम्मतवान व साहसी लोक पाहिजेत. तुमच्यामध्ये ते साहस असेल, तुमच्यामध्ये जर ती हिंमत असेल तर महायोग विज्ञानाची प्रयोग शाळा असणाऱ्या ओंकार मिशनच्या ‘ओंकार मेडिटेशन सेंटर’ मध्ये आपलं स्वागत आहे.

गुरुराज ओंकार महाराज

Blog placeholder

Gururaj Omkar Maharaj

 

ओंकार मिशनचे संस्थापक व महायोग विज्ञान या पुस्तकाचे लेखक गुरुराज ओंकार महाराज यांचा जन्म डोंबिवली शहरा मधील सोनारपाडा या गावामध्ये झाला. लहानपणापासून त्यांना अध्यात्माची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांना ध्यानबिंदू दिसू लागला व समाधी लागू लागली. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची कुंडलीनी शक्ति जागृत झाली व ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांप्रमाणे त्यांच्या मुखामधून शेकडो अभंग बाहेर पडू लागले. आपले अध्यात्मिक अनुभव जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी ‘भक्तीरहस्य’ हे पुस्तक लिहिले. ‘राहुरी कृषी विद्यापीठ’ नगर येथे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ‘ओंकार महाराज’ म्हणून नावारूपाला आले.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे अध्यात्मा वरील दहाही खंड वाचून काढले. तत्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, प्राचीन विज्ञान, आधुनिक विज्ञान व क्वान्टम थिअरी त्यांनी पूर्णपणे आत्मसात केली व संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये विज्ञानातून अध्यात्माचा प्रचार केला. बी. ए. ला असताना त्यांनी ‘विज्ञानातून अध्यात्म’ हे आपले दुसरे पुस्तक प्रकाशित केले. अनेक शास्त्रज्ञांनी(Scientist) त्यांच्या बरोबर चर्चा केली. अक्षरब्रह्म शक्तिपाताच्या सामर्थ्याने कुंडलीनी शक्ति जागृत करून ओंकार महाराजांनी शास्त्रज्ञांना अध्यात्मिक शक्तिचा अनुभव करून दिला.

ओंकार महाराजांच्या अध्यात्मिक शक्तीचा डंका आता सगळीकडे वाजू लागला. समाजा मधील उच्च विद्या विभूषित डॉक्टर, वकील, प्रोफेसर्स, इंजिनिअर्स, वैज्ञानिक, उद्योजक इत्यादी मंडळी स्वतःला ओंकार महाराज यांचे शिष्य म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागली. ओंकार महाराजांचा आदर्श होता भगवान कृष्ण. ज्याने स्वतःच्या कर्तुत्वाने द्वारका उभी केली होती. एम.ए. झाल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरु केला व अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपास आले. पैसा, वैभव, एैश्वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेवू लागले. परंतु यामध्ये त्यांना रस नव्हता. ते दिवसभर व्यवसाय करायचे व रात्रभर ध्यान करीत बसायचे. एक अज्ञात अध्यात्मिक शक्ती त्यांना सतत मार्गदर्शन करीत असायची. या काळामध्ये बारा वर्षे त्यांनी अखंड साधना केली. या काळामध्ये त्यांनी कोणत्याही अध्यात्मिक ग्रंथाचे वा पुस्तकाचे वाचन केले नाही. त्यांनी जगाचे निरीक्षण करायला सुरुवात केली. या निरीक्षणातून त्यांना Practical Philosophy, Independ Philosophy, Double Dimension Philosophy, Universal Philosophy अशा एकाहून एक अशा श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार झाला.

सत्य हे स्वसंवेद्य असून ते सिद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही याची त्यांना अनुभूती आली. वेद, उपनिषद, बायबल, कुराण यांच्या पलीकडे असलेल्या सत्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. ज्या अज्ञात शक्तीने आपल्याला हे अलौकिक ज्ञान दिले त्या शक्तीचा शोध व तिचा साक्षात्कार करून घेण्याचा अट्टाहास त्यांनी धरला. महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री त्यांची साधना सुरु असताना आपल्या आजूबाजूला काही अदृश्य शक्ती वावरत असल्याची त्यांना जाणीव झाली. डोळे उघडून पहिले तर आजूबाजूला चित्र विचित्र आकृती उभ्या होत्या. त्या आकृती पाहून त्यांना दरदरून घाम फुटला.

एवढ्यात अंतरात्म्यातून आवाज आला, भिऊ नकोस, भुतं आली आहेत म्हणजे भूतनाथ सुद्धा येणार आहे, सावध हो. दुसऱ्याच क्षणी कर्पुरासारखा वर्ण असलेले तेजःपुंज साक्षात भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले. ओंकार महाराजांना ते तेज सहन झाले नाही. ते मूर्च्छित होवून पडले. शुद्धीवर आल्यानंतर आपण जे काही पहिले जे काही अनुभवले ते सत्य होते की  कल्पना हे त्याना समजेना. एवढ्यात त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज आला, सर्व गुरूंचा महागुरू तुझ्या आतमध्ये बसला आहे. तो सर्व नाथांचा आदिनाथ आहे. त्याने तुझ्याकडून महायोग विज्ञान सिद्ध करून घेतले आहे. तू कुंडलीनी शक्ति धारण केली आहेस. तुझ्या हातून अलौकिक कार्य होणार आहे. तुला आपल्या गुरूच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर लोकांना सत्याचा अनुभव दे. ओंकार महाराज हे एक सिद्ध पुरुष आहेत. ते महायोगी व महाज्ञानी आहेत. आपल्या गुरूच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, जगाला सत्याची अनुभूती देण्यासाठी ओंकार महाराज यांनी ‘ओंकार मिशनची’ स्थापना केली. आजपर्यंत हजारो लोकांनी ओंकार महाराजांच्या सानिध्यात कुंडलीनी शक्ति जागृतीचा अनुभव घेतलेला आहे. ओंकार मिशनच्या ह्या छोट्याशा बीजाचे आज प्रचंड वृक्षामध्ये रुपांतर झालेले आहे.

– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे

ॐकारक सोऽहमधारक

Blog placeholder

ॐकारक सोऽहमधारक । अद्वैतविलासक आदिनाथ ॥ १ ॥

शक्तिप्रपातक कुंडलिनी धारक । महायोग उपासक आदिनाथ ॥ २ ॥

विश्व विकासक विश्व विनाशक । नवनिर्माण कारक आदिनाथ ॥ ३ ॥

सुक्ष्मरुप धारक महा विस्तारक । ब्रम्हांड व्यापक आदिनाथ ॥ ४ ॥

चित् धारक चैतन्य कारक । चिद् विलासक ओंकार ॥ ५ ॥

   

ॐकारक सोऽहमधारक । अद्वैतविलासक आदिनाथ ॥ १ ॥

समस्त विश्व ब्रम्हांडाचे आदितत्व हे ॐ आहे. ॐ मधूनच समस्त विश्व ब्रम्हांडाची निर्मिती होत असते. गुरु हा ॐकारक असल्यामुळे समस्त विश्व ब्रम्हांडाचे सृजन करण्याची शक्ती गुरुमध्ये असते. परंतु गुरु हा फक्त ॐकारक नाही तर तो सोऽहं धारक सुद्धा आहे. त्यामुळे अज्ञानी असलेल्या जीवाला त्याच्या सत्य स्वरुपाची ओंकार स्वरुपाची जाणीव करून देण्यासाठी गुरु त्याला सोऽहं बोधाचा उपदेश करतात.

ज्या शक्तीने समस्त विश्व ब्रम्हांडाची निर्मिती केली आहे ती शक्ती तूच आहे. ‘तत्वमसी’ तो ओंकार तूच आहेस. ह्या समस्त विश्वब्रम्हांडामध्ये भरलेली उर्जा तूच आहेस. तू व्यक्ती नाहीस तू शक्ती आहेस, तू देह नाहीस तू ब्रम्ह आहेस, तू जीव नाहीस तू शिव आहेस याची जाणीव गुरु करून देतात. गुरूच्या या दिव्य ज्ञानाने शिष्य सोऽहं बोधावर आरूढ होतो. त्याला आपल्या मूळ स्वरुपाची म्हणजे ओंकार स्वरुपाची प्राप्ती होते. हा अद्वैतविलास फक्त गुरुकृपेनेच अनुभवाला येत असल्यामुळे गुरु हा अद्वैतविलासक सुद्धा आहे.

अद्वैत म्हणजे एकच, दोन नाही. जीव आणि शिव भिन्न नाही. व्यक्ती आणि शक्ती भिन्न नाही. देह आणि ब्रम्ह भिन्न नाही. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर पदार्थ (matter) आणि उर्जा (energy) हे भिन्न नाही. देव आणि भक्त भिन्न नाही. ही दिव्य अनुभूती ‘याची देही याची डोळा’ जो अनुभवाला देतो तो गुरु. म्हणून ओंकारक आणि सोहमधारक असलेल्या हे आदिनाथा तुमचा जयजयकार असो.

 शक्तिप्रपातक कुंडलिनी धारक । महायोग उपासक आदिनाथ ॥ २ ॥

समस्त विश्व ब्रम्हांडाचे सृजन करून जी शक्ती शेष म्हणजे शिल्लक उरलेली असते ती शक्ती अणुस्वरूप धारण करण्यासाठी चक्राकार गती धारण करते. तिच्या या चक्राकार गतीमधून तिला कुंडलाकार प्राप्त होतो. म्हणून तिला कुंडलिनी म्हणतात. कुंडलिनी शक्ती म्हणजे चितशक्ती. अणूच्या गर्भापासून ते आकाशगंगेपर्यंत सर्वत्र याच शक्तीचा विलास सुरु आहे. ही चित शक्ती जो धारण करतो तो महाशक्तिशाली बनतो. भगवान आदिनाथ हे महायोग उपासक असल्यामुळे त्यांनी कुंडलिनी शक्ती धारण केली आहे. त्यामुळे शक्तीप्रपात म्हणजे शक्तिपात करून ते शिष्याला त्याच्या आत्मस्वरूपाची ओंकार स्वरुपाची अनुभूती देवू शकतात.

विश्वविकासक विश्वविनाशक । नवनिर्माणकारक आदिनाथ ॥ ३ ॥

शक्ती उर्जा ही नेहमी अस्तित्व व अनास्तित्व या माध्यमातून कार्य करत असते. जी शक्ती पर्वत निर्माण करते त्याच शक्तीच्या माध्यमातून दरी निर्माण होते. ज्या शक्तीच्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती होते त्याच शक्तीच्या माध्यमातून सृष्टीचा विनाश होत असतो. जर विनाश झालाच नाही तर नवनिर्माण कसे संभवणार? म्हणून सृष्टीच्या संतुलनासाठी जेवढ सृजन महत्वाचे आहे तेवढाच संहार सुद्धा महत्वाचा आहे. सृष्टीची निर्मिती जेवढी महत्वाची आहे सृष्टीचा विनाश सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.

या समस्त विश्वब्रम्हांडामध्ये ओतप्रोत भरलेली वैश्विक उर्जा म्हणजे ॐ होय. ही वैश्विक उर्जा ज्यावेळी सोऽहं अवस्थेला प्राप्त होते त्यावेळी तिच्यामध्ये प्रचंड गती निर्माण होते. सोऽहं अवस्था म्हणजे ‘स्पंदन अवस्था’ होय. हि शक्ती सोऽहं अवस्थेला म्हणजे स्पंदन अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तिच्यामधून निर्माण झालेल्या प्रचंड गतीमधून जी शक्ती निर्माण होते ती शक्ती म्हणजे कुंडलिनी होय. ज्यावेळी हि शक्ती प्रचंड वेगाने ब्रम्हांडामध्ये झेप घेते त्यावेळी संपूर्ण सृष्टी कंपायमान होते. समुद्राच्या लाटा प्रचंड वेगाने रोरावत आकाशामध्ये झेप घेतात. विजांचा कडकडाट सुरु होतो ढगांचा गडगडाट सुरु होतो. पंचमहाभूते आकाशामध्ये विलीन पावतात. समस्त सृष्टीचा विनाश करून शक्ती ब्रम्हांडामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्पंदन विहीन अवस्थेमध्ये ओंकारामध्ये विलीन पावते. अशाप्रकारे ब्रम्हांडामध्ये हि शक्ती कशी कार्य करते ते आपण पाहिलं. आता आपण पिंडाचा विचार करूया.

ॐकार स्वरूप असलेले गुरु ज्यावेळी शिष्यावर सोऽहं भावाने कृपा करतात त्यावेळी शक्ति पाताच्या आघाताने निद्रिस्त असलेली आदिशक्ती कुंडलिनी जागृत होते. जागृत झाल्यानंतर प्रचंड वेगाने ती ब्रह्मरंध्राकडे झेप घेवू लागते. त्यावेळी शक्तीच्या प्रचंड आवेगाने साधकाचे शरीर थरथर कापायला सुरुवात होते. शक्ती ज्यावेळी आज्ञाचक्रामध्ये वेश करते त्यावेळी तेथे ज्योत चमकू लागते. चक्रे उमटायला लागतात. दशनाद सुरु होतो. दगडासारखे कठोर असलेल अंतःकरण शक्तिच्या प्रचंड आघाताने मेणासारखे मऊ होते. कंठ सदगदित होतो. डोळ्यामधून अश्रूधारा वाहायला सुरुवात होते. जीवभावाचा नाश होतो व व्यक्ती स्वतः शिवस्वरूप बनून जातो. त्याला आपल्या मूळ स्वरुपाची ओंकारस्वरुपाची अनुभूती येते. थोडक्यात सृष्टीच्या नवनिर्माणासाठी व जीवाच्या उत्क्रांतीसाठी विनाश हा आवश्यक आहे. जोपर्यंत विनाश होत नाही तो पर्यंत नवनिर्माण संभवणार नाही. म्हणून भगवान आदिनाथ हे विश्व विकासक आहेत परंतु त्याचबरोबर ते विश्वविनाशक सुद्धा आहेत. कारण विनाशानेच नवनिर्माण संभव होणार आहे.

 सुक्ष्मरुपधारक महाविस्तारक । ब्रम्हांडव्यापक आदिनाथ ॥ ४ ॥

उर्जा हि अत्यंत सूक्ष्म आहे. मग हि उर्जा मानवी शरीरामध्ये कार्य करणारी असो वा ब्रम्हांडामध्ये कार्य करणारी असो. मानवी शरीरामध्ये आत्मा असतो. आत्मा म्हणजे आंतरिक उर्जा. हि आंतरिक उर्जा एवढी सूक्ष्म आहे की ज्यावेळी ती शरीरामध्ये प्रवेश करते त्यावेळी ती कोणालाही दिसत नाही. एवढेच नव्हे तर ज्यावेळी ती शरीरामधून बाहेर पडते त्यावेळीसुद्धा ती कुणाला दिसत नाही. मनुष्याचे सत्यस्वरूप हे फक्त शरीर नसून शरीरामध्ये असलेली आंतरिक उर्जा हेच मनुष्याचे सत्यस्वरूप आहे.

ॐकार स्वरूप असलेल्या सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण महायोग विज्ञानाचे प्रयोग सुरु केले तर आपल्याला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली महायोग विज्ञानाचे प्रयोग सुरु केले. सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या मध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याला रुपाला आणले. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ऊर्ध्वमुखे आळविला सोऽहं शब्दाचा नाद’. तुकाराम महाराजांनी उर्ध्वमुखाने सोऽहं शब्दाचा नाद आळवून आपल्या मध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याला रुपाला आणले.

अरूप परमात्मा ज्यावेळेला रुपाला येतो त्यावेळी आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश आपण ज्या काळामध्ये राहतो तो काळ व विश्व नावाची एक वस्तू हा भेद मावळून जातो. मन उन्मन होतं . मन उन्मन झाल्यावर आपला आत्मा (आंतरिक उर्जा) परमात्म्याशी (वैश्विक ऊर्जेशी) एकरूप झाल्याचा अनुभव येतो. हीच अणुपेक्षा सूक्ष्म व आकाशापेक्षा व्यापक असणारी अनुभूती होय. तुकाराम महाराजांना ज्यावेळी हि अद्वैत अनुभूती प्राप्त झाली त्यावेळी त्यांनी आपल्या अभंग म्हणजे कधीही भंग न पावणाऱ्या वाणीमधून आपला अनुभव जगासमोर मांडला. तुकाराम महाराज म्हणतात,

अणु रेणू या थोकडा । तुका आकाशा एवढा ॥

आत्मा (आंतरिक उर्जा) ही अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. हि अणुपेक्षाही सूक्ष्म असणारी आंतरिक उर्जा ज्यावेळी गुरुकृपेने परमात्म्याशी (वैश्विक ऊर्जेशी) एकरूप होते त्यावेळी हि आंतरिक उर्जा अणुपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षा हि व्यापक असल्याची अनुभूती येते. वास्तविक आत्मा (आंतरिक उर्जा ) सिमित नसून सिमातीत आहे, मर्यादित नसून अमर्याद आहे. ती तेजःपुंज, स्वयंप्रकाशित, ज्ञानघन व आनंदरूप आहे. तुकाराम महाराजांनी अथक प्रयास व प्रचंड साधना (प्रयोग ) यांच्या माध्यमातून आपल्या सत्यस्वरूपाची, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली. ओंकार स्वरूप असणारे सदगुरू आपल्या शिष्याला हि दिव्य अनुभूती प्राप्त करून देवू शकतात. कारण ते स्वतःच सूक्ष्मरूप धारक, महाविस्तारक व ब्रम्हांडव्यापक असतात. ते स्वतः तर तसे असतातच परंतु जे कोणी त्यांना शरण येतात त्यांनासुद्धा ते त्यांच्या सारखेच करतात.

 चितधारक चैतन्यकारक । चिद्विलासक ओंकार ॥ ५ ॥

प्रकाश संशोधनाच्या प्रक्रियेत विश्वाची निर्मिती हि शून्यामधून झाली नसून विश्वाच्या मुळाशी एक अखंड, अनंत उर्जा कार्य करत आहे हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. परंतु या उर्जेचे अंतिम स्वरूप काय आहे याबाबत विज्ञान अज्ञान आहे. उदा. विद्युत (Electricity) हिच्यामध्ये प्रचंड उर्जा आहे . परंतु हि उर्जा फक्त चितधारक आहे म्हणजे प्रकाशरूप आहे. परंतु ती चैतन्यकारक नाही. परमात्मा (वैश्विक उर्जा) हि चितधारक म्हणजे प्रकाशरूप तर आहेच परंतु ती त्याचबरोबर चैतन्यकारक सुद्धा आहे. प्रकाश हा जड आहे त्याच्यामध्ये जाणीव नाही. फक्त चैतन्य हे स्वयंगतिक आहे कारण त्याच्यामध्ये जाणीव आहे, ते ज्ञानघन आहे. हे विश्व जड नाही या विश्वाच्या मुळाशी उर्जा आहे ती उर्जा फक्त चितधारक म्हणजे प्रकाशरूप नसून चैतन्यकारक म्हणजे ज्ञानरूप सुद्धा आहे.

आधुनिक विज्ञान ज्या पायावर उभे आहे त्या आधुनिक विज्ञानाचा पायाच आज कॉनटम मेक्यानिक्सने उखडून टाकला आहे. हायजेनबर्गच्या अनिश्चिततावाद सिद्धांताने विज्ञानामधील निश्चितता पार धुळीला मिळवून टाकली आहे. इलेक्ट्रोनला मन आहे अशी भाषा काही शास्त्रज्ञ बोलू लागले व त्यातून ‘नॉन लोकल कनेक्शन’ ची कल्पना पुढे आली. एका ठिकाणच्या इलेक्ट्रोनवर दुसऱ्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रोनचा परिणाम होऊ शकतो हि ती कल्पना. हि ‘नॉन लोकल कनेक्शन’ ची कल्पना खोडून टाकण्यासाठी ‘आईनस्टाइन, पोडोलोस्की व रोझोन’ या तीन शास्त्रज्ञांनी १९३५ साली एक प्रयोग सुचविला तो ‘ईपीआर प्रयोग’ म्हणून पुढे खूप गाजला.

१९८२ साली ‘अलन आस्पेक्ट’ या फ्रेंच शास्त्रज्ञाने ‘ईपीआर प्रयोग’ करून बघितला. एका इलेक्ट्रोनची फिरण्याची दिशा हि लाखो मैल दूर असलेल्या इलेक्ट्रोनच्या फिरण्याच्या दिशेने क्षणात बदलली आणि शास्त्रज्ञांची मती गुंग झाली. एकदा एकत्र असलेले इलेक्ट्रोन दोन वेगवेगळ्या दिशांना गेल्या नंतर लाखो मैल दूर अंतरावर असताना एका इलेक्ट्रोनची फिरण्याची दिशा बदलल्यानंतर चक्क दुसऱ्या इलेक्ट्रोनच्या फिरण्याच्या दिशेमध्ये बदल झाला होता. हे शक्यच नव्हतं कारण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने त्यांनी एकमेकांशी संवाद साधला कसा? हे इलेक्ट्रोन एकमेकांशी संवाद साधतात तरी कसा? हे शक्यच नव्हतं.

परंतु तसं होताना दिसत होतं. इलेक्ट्रोनला मन आहे का? ते जिवंत नाहीत कशावरून? असे प्रश्न निर्माण झाले. जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन कॉनटम मेक्यानिक्स च्या समोरची लढाई हरला. ‘ईपीआर प्रयोग’ सिद्ध झाला. ‘नॉन लोकल कनेक्शनचं’ चैतन्यशक्तीचं अस्तित्व सिद्ध झालं. हे विश्व म्हणजे जडद्रव्याचा महासागर आहे असे म्हणणाऱ्या, ईश्वर मेला आहे (God is Dead ) असा निर्वाळा देणाऱ्या, आधुनिक विज्ञानाच्या पायाखालची जमीन सरकू लागली. मन, बुद्धी, आत्मा या खुळचट कल्पना आहेत. आध्यात्मिक अनुभूती म्हणजे ढोंग आहे, मेंदूवर झालेला विपरीत परिणाम आहे असे म्हणणाऱ्या विज्ञानवाद्यांची तोंडे आता मात्र पाहण्यासारखी झाली होती.

आधुनिक विज्ञान जेथे हात टेकते तेथून अध्यात्म सुरु होते. अध्यात्म हे शास्त्र आहे. महायोग हे विज्ञान आहे. हजारो ऋषीमुनींनी, साधू संतानी साधना करून (प्रयोग करून) ते सिद्ध केले आहे. वैश्विक उर्जा परमात्मा हा फक्त चित्तधारक म्हणजे प्रकाशरूप नसून तो चैतन्यधारक म्हणजे स्वयंगतिक व ज्ञानघन आहे हे अध्यात्माचे म्हणणे कॉनटम मेक्यानिक्स ने सिद्ध केले आहे. हे विश्व जड नाही, या विश्वामध्ये जड नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. हे विश्व चैतन्याचा सागर आहे. अणुच्या गर्भापासून आकाशगंगेपर्यंत सर्वत्र चैतन्याचेच अस्तित्व आहे.

हे विश्व म्हणजे चैतन्याचा विलास आहे. हा विलास आहे चिद आणि चैतन्याचा, हा विलास आहे प्रकृती आणि पुरुषाचा, हा विलास आहे शिव आणि शक्तीचा, हा विलास आहे सृजन आणि संहाराचा, हा विलास आहे विकास व विनाशाचा, हा विलास आहे आत्मा व परमात्म्याचा, हा विलास आहे विज्ञान व अध्यात्माचा. समस्त विश्वब्रम्हांडामध्ये शुभ्र धवल रंगाने, पांडूरऽरंगाने विराजमान असणाऱ्या अविनाशी उर्जेचा, माझ्या पांडुरंगाचा हा विलास आहे. माझ्या ज्ञानराज माऊलीच्या ज्ञानेश्वरी मधून साकार झालेल्या शिवशक्तीचा हा विलास आहे, हा विश्व चैतन्याचा विलास आहे. या विश्वाच्या बाहेर परमात्मा नाही.

म्हणौनि जगापरोते । सारुनी पाहिजे माते । तैसा नव्हे उखिते । सकटची मी ॥ ज्ञानेश्वरी

या जगाच्या पलीकडे, या विश्वाच्या पलीकडे परमात्मा कुठे हि नाही. भगवे वस्त्र धारण करून, लंगोटी लावून, संसाराचा त्याग करून कुठे निघालास त्याला शोधायला? हे जग माया नाही, हे विश्व माया नाही, हे विश्व त्या चैतन्याचा विलास आहे. अरे वेड्या ! जग आणि जगदीश वेगळे नाही, जीव आणि शिव वेगळे नाही, आत्मा आणि परमात्मा वेगळे नाही, ज्ञान आणि विज्ञान वेगळे नाही, योग आणि भक्ति वेगळी नाही, चिद आणि चैतन्य वेगळे नाही, ॐ आणि सोऽहं वेगळे नाही. चितधारक म्हणजे प्रकाशरूप असणारा, चैतन्यकारक म्हणजे ज्ञानघन, षडगुणऐश्वर्य संपन्न असणारा चिद्विलासक ओंकार तूच आहेस.

‘तत्वमसी, तत्वमसी, तत्वमसी ओंकारा’

– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘ओंकार गाथा’ मधील गुरु स्तवन या प्रकरणातून घेतला आहे.