Logo Omkar Mission Dombivali

कुंडलिनी शक्ती

कुंडलिनी शक्ती

शास्त्रज्ञांच्या मते हे विश्व म्हणजे शक्तीक्षेत्र आहे. विश्व अंतर्बाह्य स्फुरण पावणारे गतिमान व परिवर्तनशील आहे. विश्वाच्या प्रत्येक पदार्थात अणूंच्या इलेक्ट्रॉनचे भ्रमण स्पंदन सुरु आहे. ग्रह उपग्रह ताऱ्यांचे भ्रमण सुरु आहे. आपल्या आकाशगंगे सारख्या लक्षावधी आकाशगंगा आपल्या ब्रम्हांडामध्ये आहेत व एकेका आकाशगंगेत लक्षावधी ग्रह तारे आहेत. अणूच्या गर्भापासून ते थेट आकाशगंगेपर्यंत हे विश्व भ्रमणशील आहे चैतन्यमय आहे.

आकाशगंगेतही नवीन तारे जन्मास येत असतात. काही नष्ट होत असतात. काही आकुंचन पावत असतात. काही प्रसरण पावत असतात. काही उष्ण होत असतात. काही थंड होत असतात. सर्व आकाशगंगा एकमेकांपासून अजस्त्र वेगाने दूर जात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते काही काळानंतर त्यांचे दूर जाणे थांबेल व त्या उलट दिशेने प्रवास करतील त्यांच्या मध्ये आण्विक स्फोट होतील व संपूर्ण विश्वाचा संहार होईल. नंतर परत विश्वाची उभारणी सुरु होईल. ज्या शक्तीच्या सहाय्याने विश्वाची निर्मिती होते त्याच शक्तीच्या माध्यमातून विश्वाचा संहार होतो.

विश्वनिर्मिती म्हणजे क्रमविकास व विश्वसंहार म्हणजे क्रमसंकोचन. अशा प्रकारे क्रमविकास व क्रमसंकोचन अनंतकाळापासून सुरु आहे. क्रमविकास अवस्था सुरु झाल्यावर ब्रम्हांडाची निर्मिती होते. ब्रम्हांडाची रचना केल्यावर जी शक्ति शिल्लक राहते ती अणुस्वरूप धारण करण्याकरिता चक्राकार फिरू लागते. तिच्या चक्राकार स्वरुपामुळेच तिला कुंडलाकार प्राप्त होतो. हीच विश्वनिर्मिती भगवती कुंडलिनी शक्ती होय.

कुंडलिनीचे स्वरूप

कुंडलिनी म्हणजे चितशक्ती पराशक्ती शब्दब्रम्हाची स्फूर्ती होय. योगवसिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धातील ८० व्या सर्गात कुंडलिनी शक्तीचे स्वरूप विवेचन करताना वसिष्ठ म्हणतात शरीरात सुषुन्मा म्हणून एक नाडी आहे ती सभोवार पसरलेल्या तंतूंनी वेष्टित असल्यामुळे परिमंडलातिकार आहे. तिच्यापासून शंभर नाड्या निघाल्या आहेत. कुंडलाच्या आवर्ताखाली तिची रचना आहे. थंडीने व्याकूळ होऊन पडलेल्या मोठ्या सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणे तिने मंडल केले आहे.

ती शुभ्र आहे. प्राणवायूच्या योगाने एकसारखी स्पंदन पावणारी अशी ती सुषुन्मा नाडी आहे. तिच्या मुळाशी आत कुंडलाच्या आकाराची कुंडलिनी या नावाची चितशक्ती आहे. विणेमधून जशी तार झंकारते त्याप्रमाणे मुळाधारातून अत्यंत सूक्ष्म असा नाद तिच्यातून अनहत ध्वनीच्या रूपाने झंकारत असतो. केळीच्या गाभ्याप्रमाणे कोमल असलेल्या त्या मुलाधारातील ती पराशक्ती कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध आहे. कारण ती कुंडलाकार धारण करून आहे ती प्राण इंद्रिये मन बुद्धी इत्यादी सर्वांच्या शक्तींना स्फूर्ती देणारी आहे.

अतिशय रागावलेल्या नागिनीप्रमाणे ती एकसारखी आपल्या तोंडाने प्राणाला वर फेकते व अपानाला खाली ओढते. याप्रमाणे ती सदा श्वासोच्छवास प्रक्रियेत निःश्वासरूप होऊन राहिली आहे. कुंडलिनी शक्ती सर्व वृत्तीचे बीज असल्यामुळे प्राणामध्ये क्रियाशक्ती व बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती उत्पन्न करते. महासागरात जशा नदया विलय पावतात. त्याप्रमाणे तिच्यामध्ये सर्व नाड्या विलय पावतात. प्राणशक्तीस्वरूप मुलाधारस्य कुंडलीनी पासून प्रणवादी सर्व मंत्रांची उत्पत्ती होते. गायत्री मंत्राची उत्पत्ती कुंडलीनी पासून होते हे सांगताना योगचुडामणी उपनिषदांत असे म्हटले आहे की कुंडलिनी शक्ती हि प्राणशक्तीयुक्त अशा गायत्रीचे उत्पत्तीस्थान आहे. प्राण विद्यारुपाने ज्या गायत्रीची उपासना केली जाते ती खरोखर कुंडलिनीच्या रूपाने साकार झालेली महाविद्याच होय. जो या महाविद्येला जाणतो तोच खरा वेदविद्येचे रहस्य जाणतो.

सर्पाला जशी दोन तोंडे असतात त्याप्रमाणे कुंडलिनीला अंतर्मुख व बहिर्मुख अशी दोन मुखे असतात. ती एका मुखाने ब्रम्हव्दार अडवून निद्रा घेते व दुसऱ्या मुखाने ती श्वास-प्रश्वास करते. हाच जीवाचा श्वासोच्छ्वास होय. एका मुखाने ही शक्ती नेहमी जागृत असते. या जागृतीमुळेच जीवाला बाह्य ज्ञान किंवा चेतना चांगल्या रीतीने होते. कुंडलिनीच्या या बहिर्मुख गतीमुळेच जीवाला एकत्वाची जाणीव न होता भिन्नतेची जाणीव होते. कुंडलिनी शक्तीचे अंतर्मुख हे सुप्त किंवा बंद असल्यामुळे जीवाला आपण कोण आहोत हे कळत नाही. त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा कायम अभाव असतो.

अद्वयतापोनिषदात कुंडलिनीचे वर्णन करताना ऋषींनी म्हटले आहे कि देहामध्ये सूर्यासारखी तेजस्वी रूप असलेली व पोर्णीमेच्या चंद्राप्रमाणे शितल असलेली सुषुन्मा नावाची नाडी आहे तिचा आरंभ मुलाधारापासून होऊन ती ब्रम्हरंध्रापर्यंत जाते. या नाडीमध्ये कोटीकोटी विजेप्रमाणे तेजस्वी व कमळाच्या तंतूप्रमाणे सूक्ष्म असलेली कुंडलिनी नावाची प्रसिद्ध शक्ती वास करते.

महानारायण उपनिषदांमध्ये कुंडलिनीचे फार सुंदर वर्णन आले आहे ही कुंडलिनी शक्ती दोन ढगांमध्ये प्रकट होणाऱ्या विद्यूतलतेप्रमाणे तेजस्वी आहे. विजेपेक्षाही चपळ व अत्यंत बलवान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्तीचे जे अपूर्व वर्णन केले आहे. ते कुंडलिनीचे स्वरूप समजून घेण्यास अतिशय उपयुक्त असे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-

नागिणीचे पिले| कुंकुमे नाहले| वळण घेऊन आले| शेजे जैसे ||

कुंकवाने किंवा केशराने न्हालेले नागिणीचे पिल्लू वेटोळे घालून निजलेले असावे त्याप्रमाणे मुळाधारात ती लहानशी सर्पासारखी कुंडलिनी शक्ती साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून निजलेली असते. ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे नाभीस्कंदात नीट घट्ट व संकोचून बसलेली असते. ती कुंडलिनी जगदंबा आहे. जगाची माता आहे. सार्वभौम चैतन्याची ती ऐश्वर्यरूप शोभा आहे. ती जगद बीजाचा अंकुर जो जीव त्याच्यावर सावली धरते. ती निराकार ब्रह्माची साकार मूर्ती परमात्मा शिवाची संबळी व ओंकाराची जन्मभूमी आहे.

कुंडलिनी शक्ती जेव्हा हृदयापाशी येते. तेव्हा ती आपल्या तेजाची शिदोरी चैतन्याला अर्पण करते म्हणजे ती हृदयस्थ प्राणरूप आत्म्याशी आपल्या तेजासकट एकरूप होते. अर्थात कुंडलिनी आपली तेजरूप कांती टाकून जेव्हा प्राणरूप धारण करते त्यावेळी तिचे स्वरूप पुढील प्रमाणे दिसते. एखाद्या वाळूच्या बाहुलीला सोन्याचा पितांबर पांघरावा व तो सोडून मग तिला वेगळे करून ठेवावे त्याप्रमाणे ती दिसते. वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत विझावी किंवा वीज चमकून एकदम आकाशात नाहीशी व्हावी त्याप्रमाणे हृदय कमळापर्यंत जाऊन ती सोन्याच्या सरीसारखी किंवा प्रकाशाचा तेजोमय झरा वाहत असल्याप्रमाणे दिसते. तो शरीररूप तेजाचा झरा हृदयरुपी भूमीच्या पोकळीत एकदम जिरतो व शक्तीचे रूप शक्तीतच विरते. शिवाशी एकरूप झाल्याने ती फक्त प्राणरूपाने जाणली जाते. साऱ्या भौतिकाचा आधार असणारी ही शक्ती अनिर्वचनीय आहे. हीच तिची खरी ओळख आहे. हेच हिचं खर स्वरूप आहे.

कुंडलिनी जागृतीची आवश्यकता

वास्तविक शक्ती एकच आहे. ‘एकोSहं बहुस्यामि’ मी एक आहे मी बहु व्हावं या स्फूर्तीने ती सृष्टीच्या विविध कोटीत रुपांतरीत होते. आधुनिक विज्ञान म्हणत आहे कि उष्णता, विद्युत, चुंबक, गुरुत्वाकर्षण, आकर्षण, अपसारण ह्या एकाच शक्तीची विविधरूपे आहेत. शास्त्रज्ञांनी उर्जा अविनाशाचा सिद्धांत मांडून ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणतात उर्जा निर्माण करता येत नाही तसेच तिचा नाशसुद्धा करता येत नाही. फक्त उर्जेचं रुपांतर करता येत. जे आपल्या इंद्रियांना प्रत्यक्ष जाणवतं ते जडद्रव्य वस्तूतः ते जडद्रव्य नाही तर त्याचे स्वरूप उर्जेचे आहे.

या संदर्भात ‘मॅक्स फ़ॅक्स’ या शास्त्रज्ञाची (Quantum Theory) क्रांतिकारक मानली जाते. जडवस्तू (Matter) व उर्जा (Energy) यांचे परस्परांत परिवर्तन होऊ शकते. यापैकी जडवस्तू हे उर्जेचे स्थूल स्वरूप आहे. उर्जा ही अत्यंत सूक्ष्म व अनिर्वचनीय आहे. रेडीओ लहरी, दूरदर्शन लहरी व प्रकाशलहरी यांत मुलतःच कोणताही भेद नाही. या सर्व लहरींना Electro Magnetic Radiation असे सामुदायीक नाव आहे. अशाप्रकारे ती एकच शक्ती सृष्टीच्या विविध कोटीत कशी रुपांतरीत होते हे आपण पाहिलं.

ही शक्ती अमर्याद अनंत असल्यामुळे सृष्टीचा पूर्ण पसारा उभारूनही शेष म्हणजे शिल्लक राहते. ही शेष राहिलेली शक्ती म्हणजे मुलाधारातील कुंडलिनी शक्ती होय. ही जेव्हा उर्ध्वभिमुख होते तेव्हा उत्क्रांतीला सुरुवात होते. उत्क्रांती शिखरावरील मानवदेह हे आत्मसाक्षात्काराचे उत्कृष्ट साधन आहे. आत्मा नित्य शुद्ध मुक्त असल्यामुळे तो मूलतःच पूर्ण आहे. सूर्यामुळे उत्पन्न होणारे ढग ज्याप्रमाणे सूर्यालाच झाकतात व काही काळ आपल्याला सूर्यदर्शन होत नाही. त्याप्रमाणे शुद्ध चैत्यन्यरूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी ‘अहं’ ही स्फूर्ती होते व या स्फुर्तीज्ञानामुळे मनुष्य स्वतःला देह समजतो व काही काळ आपल्याला आत्मदर्शन होत नाही. परंतु ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा यावा आणि सर्व ढग उडून जावे त्याप्रमाणे सदगुरु कृपारूपी वारा वाहू लागला कि अज्ञानाचे ढग नाहीसे होतात व स्वयंप्रकाशरुपी आत्मा स्वतेजाने तळपू लागतो. त्यावेळेला मी देह म्हणजे जड आहे ही भावना नाहीसी होऊन मी ब्रम्ह म्हणजे चैतन्य आहे ही अनुभूती येते. ही अनुभूती प्राप्त होण्यासाठी कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची आवश्यकता असते. कारण कुंडलिनी म्हणजे चैतन्यशक्ती.

ही शक्ती मूलाधारात वास करते. तिच्या अस्तित्वामुळेच सृष्टीचा आधार मूलाधार आहे. या आधाराच्या ठिकाणीच सर्व देवता वास करतात. या आधाराच्या पश्चिम भागात इडा पिंगळा व सुषुन्ना यांचा संगम होतो. ज्यावेळी गुरुकृपेने शक्ती जागृत होते. त्यावेळी मन व प्राण यांचा संयोग होऊन साधकाला दिव्य स्नान घडते. तेव्हा केवळ तेव्हाच तो साधक सर्व पापांतून मुक्त होतो. एरव्ही कुंभ मेळ्यात कितीही डुबक्या मारल्या तरी त्याला काही अर्थ नाही. ते फक्त भौतिक स्नान आहे. मन धुवायचं असेल तर इडा पिंगळा व सुषुन्नेच्या संगमातच स्नान घडलं पाहिजे आणि हे स्नान सदगुरुकृपेने कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर उपभोगाला भेटत. एरव्ही हे कदापीही शक्य नाही. मुलाधाराच्या पश्चिम भागामध्ये स्वयंभू लिंग असून तेथेच सुषुन्नेचा प्रवेशद्वार म्हणजे ब्रम्हद्वार आहे. हा मार्ग जेव्हा मोकळा होतो तेव्हा साधक सर्व प्रकारच्या संसार बंधनातून मोकळा होतो.

आपण मागे पाहिलेच आहे कि कुंडलिनी शक्ती ही द्विमुख शक्ती आहे. म्हणजेच कुंडलिनी शक्तीला दोन मुखे आहेत. ती एका मुखाने ब्रम्हद्वार अडवून निद्रा करते व दुसऱ्या मुखाने जागृत असते. त्यामुळेच जीवाला बह्यज्ञान किंवा चेतना प्राप्त होते परंतु फक्त चेतनेने चैतन्याची अनुभूती कशी येणार. चैतन्याची अनुभूती येण्यासाठी ही निद्रिस्त शक्ती जागृत होणे आवश्यक आहे. चितशक्ती ज्यावेळेला जागृत होते त्यावेळी शरीरातील प्रत्येक कणातून रक्तवाहिन्यातून चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होतो. त्यामुळे शक्तीचे कार्य सुरु होऊन शरीराची जडता कमी होते व ही शक्ती क्रमाक्रमाने मनुष्याचे चैतन्यरूप प्रकट करते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर त्याच्या देहाची जशी स्थिती असेल व मनाची जशी धारणा असेल त्याप्रमाणे शक्ती जागृत होऊन विकास होतो. अज्ञान जावून ज्ञान प्रकट होऊ लागते. कुंडलिनीच्या जागृतीमुळे हा विकास व ज्ञानप्राप्ती आपोआप घडून येते व शेवटी मनुष्याचा उद्धार होतो. ‘उत’ म्हणजे वरच्या दिशेने व ‘धार’ म्हणजे चैतन्याचा प्रवाह. कुंडलिनी ही चैतन्यमयी असल्यामुळे ती जागृत झाल्यावर ऊर्ध्वमुखाने म्हणजे वरच्या दिशेने चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होऊन शेवटी संपूर्ण चैतन्याची प्रचीती येते. ही प्रचीती येण्यासाठी कुंडलिनी जागृती अत्यंत आवश्यकता आहे. किंबहुना कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय ही अनुभूती येणे कदापीही शक्य नाही. सात्विकभाव जागृत होतात.

ही शक्ती दैवी ज्ञानाने युक्त असल्यामुळे प्रज्ञा जागृती, प्रतिभाशक्ती, कवित्व, ग्रंथनिर्मिती, असामान्य वक्तृत्व, नेतृत्व, शास्त्रामधील गूढ सिद्धांताची फोड, अतींद्रिय शक्ती जागृती, नवनवीन सिद्धांताची निर्मिती, प्रचंड आत्मविश्वास निडरपणा, कालबाह्य झालेल्या रुढी नियम तोडून सामाजिक विकासासाठी नवीन मूल्यांच्या निर्मिती इत्यादी गोष्टी आपोआप घडू लागतात. सरतेशेवटी मायेच्या यच्चयावत् बंधाचा पूर्ण निरास होऊन आत्मा स्वतेजाच्या प्रकाशाने चमकू लागतो. व्यक्ती स्वतःच शिवरूप होऊन जागृत कुंडली बनून ज्याप्रमाणे एका दिव्याने अनेक दिवे पेटवावे त्याप्रमाणे तो लोकांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करून लक्ष लक्ष ज्ञानदीप प्रज्वलित करतो.

शंका व समाधान

वरील सर्व विवेचन वाचल्यानंतर कदाचित कुणी अशी शंका घेईल की आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती जर अस्तित्वात आहे तर आतापर्यंत एकाही शरीरशास्त्रज्ञाला ती कशी दिसली नाही. आज विज्ञान एवढ प्रचंड प्रगत झालं आहे. कितीतरी प्रकारच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा फोटोग्राफी व एक्स-रे मशिन्स निघाल्या आहेत. मग तरी सुद्धा अजूनपर्यंत ह्या कुंडलिनीच दर्शन एकाही शरीर शास्त्रज्ञाला कसं झालं नाही. ज्या गोष्टी आधुनिक प्रगत विज्ञानाला माहित नाही त्या गोष्टी प्राचीन ऋषीमुनींनी कशा जाणल्या. खरोखर हे सत्य आहे कि थोतांड? कुंडलिनी शक्ती ही कपोलकल्पित गोष्ट तर नाही ना?

आपल्या सर्व शंका रास्त आहेत. बरोबर आहेत. आधुनिक विज्ञान प्रगत जरूर झालं आहे परंतु विज्ञानाला सुद्धा काही मर्यादा आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विज्ञान दृश्यावर प्रयोग करत आहे. विविध प्रयोगशाळा, विशिष्ट उपकरणे, अत्याधुनिक यंत्रे हि विज्ञानाची साधने आहेत. वैज्ञानिक ज्ञान हे सापेक्ष आहे. कारण ते शरीर मन बुद्धीच्या कक्षेत आकलन करता येत. अध्यात्मिक ज्ञान मात्र आपली इंद्रिये मन बुद्धी यांच्या कक्षेत आकलन करता येत नाही. ‘यतो वाच्यो निर्वतन्ते अप्राप्य मनसा सह:’ येथे वाचा खुंटीत होते. मन उन्मन होऊन बुद्धीची मर्यादा संपते.

अध्यात्म ज्ञान हे निरपेक्ष आहे. त्यामुळे ते विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. आधुनिक विज्ञानाने हि गोष्ट मान्य केली आहे. भौतिक शास्त्रज्ञ भौतिक वस्तूचे पृथक्करण करून मानवी सुखात भर टाकत होते. तोपर्यंत सर्वकाही ठिक चाललं होत. परंतु ज्यावेळी ते प्राण, मन, बुद्धी, आत्मा ह्या चैत्यन्यशक्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले त्यावेळी त्यांची सृष्टी संशोधनाची आधुनिक साधने तेथे तोकडी पडू लागली आणि मग विज्ञानशास्त्रातले प्रकांड पंडित आईनस्टाईन, मिलीकन, एडिसन म्हणू लागले की आधुनिक विज्ञानाची सृष्टी संशोधनाची पद्धती तिच्या पलीकडे असणाऱ्या अदृश्य शक्तीला (Spiritual world) लागणे शक्य नाही. एन. वासुदेवन या विचारवंतानेही अणुमधील अधिष्टात्री देवता ही शास्त्रीय ज्ञानाच्या पलीकडे आहे अस म्हटलं आहे. पहा Modern Science & Self knowledge – Mountain Path July 1984. विज्ञानाच्या पलीकडे काही क्षेत्रे आहेत हे शास्त्रज्ञ नम्रपणे कबुल करू लागले आहेत. परंतु विज्ञानच न समजलेले काही शहाणे मात्र अध्यात्म व अध्यात्मिक साधना यांना मेंदूवर झालेला परिणाम संमोहन वगैरे नाव देवून खोट्या ठरवू पाहत असतात. असो, तांदळामध्ये नाही का खडे असतात. जग हे असेच आहे व ते असेच राहणार. आपण मात्र आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

प्रख्यात वैज्ञानिक एडिसन म्हणतो की कोणतीतरी अज्ञात अव्यक्त शक्ती कारणरूपाने कार्य करत आहे. आम्ही त्या तत्वाबद्दल त्या शक्तीबद्दल काही जाणत नाही. भौतिक जगाच्या पलीकडे काही अज्ञात अव्यक्त तत्वाशी सामना करावा लागतो हेही सत्य शास्त्रज्ञांनी आता कबुल केलं आहे. आपल्या सर्वांना मन आहे. अहो मन आहे म्हणून कॉलेजमध्ये आपण मानसशास्त्र शिकतो ना! आपल्याला फक्त मन आहे एवढंच नाही तर या मनाला काही रोग सुद्धा आहेत असं आपण मानतो म्हणून mental hospitals सुद्धा आहेत. परंतु मन कोठे आहे? मेंदू डोक्यात असल्यामुळे व त्याची शंभर टक्के खात्री असल्यामुळे मन मेंदूतच आहे. असा चुकीचा गैर समज आपला झाला आहे.

भौतिक शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कार्याचे वर्णन केले असले तरी अमुक एक भाग म्हणजे मन असा उल्लेख कोठेही केला नाही. तसेच मेंदूलाच कोणी मन म्हणत नाही. मेंदू हा जड तत्वांचा बनला असल्यामुळे त्याला चैतन्याचे गुण नाहीत. Mental Hospital असले तरी कुणी मनावर शस्त्रक्रिया केल्याचे अगर मनाला इंजेक्शन मारल्याचे ऐकिवात नाही. कारण मन अदृश्य आहे. म्हणजे विज्ञानाच्या मर्यादित साधनांनी व उपकरणांनी त्याच अस्तित्व सिद्ध करता येत नाही. प्रत्येक क्षणाला ज्याच अस्तित्व आपण मान्य करतो ते मन जर विज्ञानाला दाखवता येत नाही तर मनाला चेतना देणारी शक्ती भगवती कुंडलिनी शक्ती ती विज्ञानाच्या मर्यादित उपकरणांनी कशी बरे दाखवता येईल. कुंडलिनी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव न घेता तिच्या विषयी बोलणारे धर्माचार्य व विज्ञानवादी या दोघांमध्ये काहीही फरक नाही. कुंडलिनी शक्तीचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते छातीठोकपणे सांगतात कुंडलिनी शक्ती, चैतन्यशक्ती ही आपल्या आत मध्ये विराजमान आहे. तिला जागृत करून मनुष्य चैतन्यरूप होऊ शकतो.

भारतीय संस्कृती व भारतीय तत्वज्ञानाची ओळख ज्यांनी संपूर्ण जगाला दिली ते विश्वविजेते स्वामी विवेकानंद राजयोग ग्रंथाच्या चौथ्या प्रकरणात असे म्हणतात की संपूर्ण ज्ञान व संपूर्ण चैतन्य यांची प्राप्ती करून घेण्याकरिता कुंडलिनी जागृत करणे हा एकच उपाय उपलब्ध आहे. सर्व सुखाची जननी प्राणशक्ती कुंडलिनी तुमच्या जवळच आहे. तिची आराधना करा तिला आळवा तिचे दुध तुम्हांस मिळाले तर अनंत काळापासून तुम्हांस लागलेली क्षुधा व तृष्णा तत्क्षणीच शांत होईल. विज्ञान या बद्दल अज्ञान आहे. व आपल अज्ञान विज्ञानाने कबूल केलं आहे. भावी काळात ही आनंदाची गोष्ट आहे. चला आपण विज्ञानातून अध्यात्माकडे वाटचाल करूया.

– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *